ससा आणि कासव 2.
तुम्हाला ससा आणि कासवाची शर्यतीची गोष्ट माहितीच असेलच!
मूळ कथा
ससा कासवाची शर्यत ठरते. सशाला आत्मविश्वास असतो पळत पळत जातो. एके ठिकाणी दमतो अन झोपतो. कासव हळुहळु चालत रहाते. सशाला पहाते. हळुच निघुन जाते. जिंकते.
आपल्याला आपल्या आई वडिलांनी अनेक वेळेस हा दाखला दिलेला असतो अन सश्यासारखी घाई न करता संयमाने वागायचा सल्ला देखील दिलेला असतो. हो ना?
मला नेहमी प्रश्न पडायचा कि ह्या सशाचे आणि कासवाचे पुढे काय झाले? ते पुन्हा भेटले तर? सशाला दुसरी संधी मिळाली का? मी असे प्रश्न जेव्हा विचारले तेव्हा माझ्या घरातील कोणाकडेच ह्याची उत्तर नव्हती. पुढे कालांतराने शिक्षण आणि वय वाढत गेल्यावर कुतूहल कमी होत गेले आणि असे प्रश्न पडेनासे झाले.
पुढे जेव्हा माझ्या मुलाला हेच प्रश्न पडले तेव्हा परंपरागत पद्धतीने त्याला झिडकारून ह्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न केला पण नंतर कुठेतरी अजूनही बालपण शिल्लक आहे कि काय म्हणून स्वतःच यांची उत्तरे शोधायची किंवा लिहायची असे ठरवले.
तर मग, काय झाले असेल तेव्हा? शांताराम नांदगावकरांची कविता / गाणे आठवले आणि त्याचा शेवट.
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई
निजला तो संपला, सांगे ससा!
कुठलीही चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे ती चूक आहे हे मान्य करणे. चला हे तर सशाने केले होते. तो ओशाळला होता. म्हणजे पुढे जाऊन त्याने आपली चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न केला असणार. "अनुभवातून शहाणपण" - अरे व्वा हे तर अगदी "तात्पर्य" ला फिट बसते. आता ह्या तात्पर्यावरून आपण गोष्ट लिहू.
कथा २
ससा पुन्हा एकदा कासवाला भेटतो आणि कासवाशी तशीच पैज लावतो. कासवाला आता त्याला भलताच (अगदी १० मॅच ओळीने जिंकल्यावर येतो तसा) आत्मविश्वास असतो. परत शर्यत चालु. या वेळी मात्र ससा झोपत नाही. पटापट पाय उचलत, झोपायचे नाही असे मनाशी घट्ट ठरवुन थेट शेवटाला जावुन पोहोचतो. कासव हळुहळु येते. रस्त्यात झोपलेला ससा दिसत नाही. येवुन पाहते तर ससा जिंकलेला. कासव चरफडत शांत बसते.
तात्पर्य: "अनुभवातून शहाणपण"
आता खरंतर इथं थांबायला काहीच हरकत नाही पण .... आता कासवाला कळत कि ह्या शर्यतीत जिंकणे आपल्याला कधीच शक्य नाही. तो सशाला रागातच म्हणतो "अरे ते घर मी तो ससा भी शेर होता है, हिम्मत असेल तर मी म्हणेल तिथे माझ्याबरोबर शर्यत लाव मग मी तुला दाखवतो". सशाला माहिती असते कि कासव जिवाच्या आकांताने जरी पळाले तरी त्याच्या वेगाशी ते कधीच स्पर्धा नाही करू शकत त्यामुळे तो हि म्हणतो "अरे कासवा, ठराव तू म्हणशील तिथे, म्हणशील तेव्हा, मी तयार आहे, हा हा हा"
कथा ३
कासव आता पूर्ण तयारी करून पुढचा शर्यतीचा दिवस ठरवतो आणि सशाशी पैज लावते. मार्ग कासव ठरवेल असे ठरलेले असते त्यामुळे ससा तयार होतो. शर्यत चालु होते. अरे पण हे काय मधेच शर्यतीच्या रस्त्यात नदी लागते. ससा थबकतो, विचारात पडतो ह्याला पार कसे करायचे? मागाहुन कासव हळुहळू येते. अलगद नदीत उतरते. पलिकडे जाते आणि शर्यत जिंकतो. ससा हिरमुसला होतो.
तात्पर्य - आपले शक्तिस्थान व कमकुवत स्थान प्रत्येकाने ओळखले पाहिजे.
पुढे जाऊन असे ऐकिवात आहे कि ससा आणि कासव हे एकमेकांचे घट्ट मित्र होतात आणि अश्या अनेक शर्यती ते एकत्र धावतात, इतर प्राण्यांबरोबर पैजा लावून जिंकतात आणि खूप श्रीमंत होतात, त्यांना प्रसिद्धी मिळते.
कथा ४
जगप्रसिद्ध ससा आणि कासव यांची पुन्हा एकमेकांशी शर्यत लावावी असा आवाज जनमानसातून येतो आणि खूप स्पॉन्सरर सेलिब्रिटी वगैरे यांच्या उपस्थितीमध्ये भारतातील पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटनाला यांची शर्यत ठेवली जाते. शर्यत चालु होते सगळी कडून टाळ्या शिट्ट्यांचा वर्षाव होत असतो. यावेळी ससा मधेच वाटेत झोपल्याचे नाटक करतो. कासव जवळ येताच तो हळूच कासवाच्या पाठीवर जावुन बसतो. अगदी आरामात बसतो. कासव हळुहळु पुढे जात असते. शर्यत संपताना कासवाला दिसते कि पुढे ससा नाही, ते भलतेच खुश होते, मात्र ससा अगदी शेवटच्या क्षणी कासवाच्या पाठीवरून फिनिश लाईनच्या पलीकडे उडी मारतो आणि जिंकतो.
तात्पर्य = ??
तुम्हीच सांगा.
- विश्वेश